रायतळी हे दहाणू तालुक्यातील एक निसर्गरम्य व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ व डोंगररांगांच्या सान्निध्यात वसलेले हे गाव हिरव्या निसर्गाने नटलेले असून येथे पारंपरिक जीवनशैली आजही टिकून आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६०० कुटुंबे राहतात. एकूण ३०२९ लोकसंख्येपैकी १५१७ पुरुष तर १५१२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.गावातील लोकांचा निसर्गाशी घट्ट संबंध असून शेती, फळबागा (विशेषतः चिकू, आंबा) व हंगामी पिकांवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. तसेच काही ग्रामस्थ मासेमारी व लहान व्यवसाय करूनही आपला उदरनिर्वाह करतात.